महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 km अतंरावर ही घटना घडली आहे
रायगड : महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 km अतंरावर ही घटना घडली आहे. या घटनेत 30 घरे गाडली गेल्यामुळे यामध्ये एकूण 72 नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाड शहरासह तालुक्यात विदारक परिस्थिती असून दुर्घटनेच्या ठिकाणचा सपंर्क तुटला आहे.
मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, 72 नागरिक बेपत्ता
कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड तसेच कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस आहे. येथे पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी तर घरांत पाणी घुसले आहे. रस्त्यावर तब्बल 10-10 फूट पाणी साचले आहे. या पूरस्थितीमध्ये अनेक नागरिक त्यांच्या घरात अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे आता आणखी एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 किलोमिटवर एक दरड कोसळल्याची माहिती मिळतेय. या घटनेत तब्बल 30 घरे दबल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरामधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
रायगडमध्ये मुसळधार पाऊस
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. महाड आणि माणगाव तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पाऊस बरसत असून आता पुन्हा पाऊस वाढला आहे. येथील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड शहरात अजून पाणी भरलेले आहे.